रविवार, १४ ऑक्टोबर, २०१२

धम्मचक्र प्रवर्तन दिन कोणता ?

  नेमका धम्मचक्र प्रवर्तन दिन कोणता ? १४ ऑक्टो. कि दसरा ? असे गोंधळ हल्ली काही लोकांनी निर्माण केले आहेत त्याचा उलगडा करण्याचा हा एक प्रयत्न .
       डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दसरा ह्या दिवशी दिनांक १४ ऑक्टोंबर १९५६ ला बुद्ध धम्माची दीक्षा घेतली . त्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय अपेक्षित होते दसरा कि दिनांक हा गोंधळ वास्तविक म्हणजे होण्यासारखा नाहीच आहे . तरी काही मंडळींनी विनाकारण हा गोंधळ निर्माण करून बौद्ध समाजाची दिशाभूल केलेली आहे . दसरा ह्यास दुसरा शब्द म्हणजे अशोक विजयादशमी . फक्त ह्या दोन गोष्टींचा विचार केला तर अगदीच स्पष्ट आहे कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दसरा ह्या दिवसाशीच संबंध होता. आता ह्या दिवसाचे महत्व आपण तपासून पाहूया .
      १४ ऑक्टोंबर १९३४ ह्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बुद्धाचे चारित्र्य भेट देणारे त्यांचे गुरु कृष्णाजी केळूसकर यांचा मृत्युदिन तसेच दिनांक १३ ऑक्टोंबर १९३५ ह्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला येथे हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली . त्यानुसार कृष्णाजी केळूसकर यांची २२ वि पुण्यतिथी व धर्मांतराची घोषणा केल्यानंतर बरोबर २१ वर्षानंतर चा दिवस म्हणजे १४ ऑक्टोंबर १९५६ . ह्या दोन गोष्टींचा विचार केल्यास १४ ऑक्टोंबर तारीख महत्वाची वाटते . दसरा हा दिवस म्हणजे अशोक विजया दशमी ह्या गोष्टीचा विचार केला तर दसरा हा दिवस महत्वपूर्ण वाटतो . सम्राट अशोक ने त्या दिवशी बुद्ध धम्म ची दीक्षा घेतली . तसेच १९५६ ह्या दिवशी २५०० वि वैशाख पौर्णिमा आहे . ह्यानुसार १९५६ ला महत्व प्राप्त होते . ह्या सर्व गोष्टी चा विचार केला असता दसरा दिनांक १४ ऑक्टोंबर १९५६ हा दिवस अत्यंत महत्वाचा होता . म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या दिवशीच दीक्षा घेतली . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेचा परिचय कदाचित निवडलेल्या दिवसावरून अगदी योग्य व्हावा . ह्या गोष्टींचा विचार केला असता नेमके डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तारीख महत्वाची होती कि दसरा हा गोंधळ माजतो .
    ह्या गोंधळाला मिटवण्यासाठी आपण ह्याची प्रत्येक बाजू तपासण्याचा प्रयत्न करुया . प्रथम केळूसकर गुरुजी च्या पुण्यतिथी चा विचार करुया . कृष्णाजी अर्जुन केळूसकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु . त्यांच्या मुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लक्ष बुद्ध धम्माकडे गेले . पण त्यांचे एवढ्या ऐतिहासिक घटनेला एकट्याला उद्देशून बाबासाहेबांना जर कार्य करायचे असते तर त्यांनी तसे जाहीर केले असते पण तसे जाहीर न करणे म्हणजे ते महत्वाचे कारण म्हणता येत नाही . बाबासाहेबांनी कुठेही तसे जाहीर केले नाही कि मी बुद्ध धम्माची दीक्षा केळूसकर गुरुजी च्या पुण्यतिथी च्या दिवशी घेत आहे म्हणून हा मुद्दा मागे पडतो . दुसरा भाग तो १३ ऑक्टोंबर १९३५ ह्या दिवशी घोषणा केली त्यास १४ ऑक्टोंबर १९५६ ला २१ वर्ष पूर्ण होतात पण ह्या गोष्टीचा सुद्धा जाहीर उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आढळत नाही . त्यामुळे ह्या दोन्ही शक्यता कितपत योग्य म्हणाव्या ? २९ सप्टें.१९५६ ‘प्रबुद्ध भारत’ ह्या साप्ताहिकात पहिल्या पानावर आर. डी. भंडारे यांचा लेख आहे त्या लेखात वर्णन असे , “ १९३५ साली डॉ. बाबासाहेबांनी ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असेन पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा केली आहे , तिची पूर्तता २१ वर्षानंतर होत आहे .” पण असे काही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेले कुठेही आढळत नाही .पण तरी हा एक पुरावा म्हटला पाहिजेच कारण प्रबुद्ध भारत हे साप्ताहिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा नजरेखालून जाऊनच तयार होत असावे किंवा नंतर वाचनात नेहमी येत असावे पण त्यास त्यांनी महत्व दिलेले आढळत नाही . न दुसरी विशेष गोष्ट म्हणजे हा मुद्दा आर .डी. भंडारे यांनी तिसऱ्या बातमीत अगदी दोन ओळीच्या ‘प्रतिज्ञाची पूर्ती’ ह्या शीर्षका खाली आटोपला आहे त्या अर्थी त्यांनी हि ह्यास खास असे महत्व दिलेले आढळत नाही .
    आता तिसरी आणि महत्वाची बाब म्हणजे दसरा . ह्या वर .दिनांक २९ सप्टें.१९५६ ;प्रबुद्ध भारत’ ह्या अंकात काय काय होते ? प्रबुद्ध भारताच्या अंकाची सुरुवातच त्या अंकात सम्राट अशोकाच्या नवव्या शिलालेखाने केली गेली . प्रबुद्ध भारताचा अंकात डाव्या बाजूला वरती बाबासाहेब आंबेडकर यांचा सुविचार असायचा तर उजव्या बाजूला विचारवंतांचे सुविचार असायचे ह्या अंकात उजव्या बाजूला वरती सम्राट अशोकाचा नवव्या शिलालेखाचे विचार दिले आहेत .ते असे .
“ दान करणे पुण्य कारक आहे परंतु धर्म दानाची तुलना करता येईल असे दुसरे कोठलेही दान नाही म्हणून मित्र , हितचिंतक , आप्त ,सोबती यांनी एकमेकास आग्रहाने हे पुण्यदायक कर्तव्य करण्यास सांगितले पाहिजे . – सम्राट अशोक (नववा शिलालेख)” हे वाचले असता जणू डॉ.बाबासाहेब हे दान करणार व त्यांचे अनुयायी सुद्धा करणार असेच वाटते.
त्याच पानावर मुख्य बातमी “ धर्मचक्राच्या नव प्रवर्तनासाठी चलो नागपूर डॉ. बाबासाहेब यांचा बौद्ध दीक्षा समारंभ विजयादशमी १४ ऑक्टोंबरच्या सुप्रभाती” आता ह्या बातमीत विजयादशमी ह्या शब्द येण्याचे कारण काय ? दिनांक देणे हा भाग अगदीच सामान्य आहे . साधा बौद्ध पौर्णिमेचा उल्लेख जर करायचा असला तर ह्या वर्षी बौद्ध पोर्णिमा अमुक ह्या तारखेला येत आहे असाच कोणीही माणूस उल्लेख करेल ह्यात नवल नाही . तसेच कोणतीही पोर्णिमा , अमावस्या ह्या दिवशी निश्चिती सांगायची असेल तर आपण त्यासोबत तारीख सुद्धा सांगणारच ह्यात तारीख ओघाने येत असते .ह्या बातमीचा लेख लिहिणे येथे गरजेचे आहे . तो पुढे देत आहे .
    भारतीय बौद्धजन समितीचे प्रवर्तक आणि अध्यक्ष ,भारतातील दलित जनतेचे कंठमणी , अंतरराष्ट्र कीर्तीचे घटना – पंडित ,अखिल भारतीय शे.का.फेडरेशन चे संस्थापक आणि कर्णधार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी येत्या १४ ऑक्टोंबर १९५६ च्या सकाळी ८ वाजता नागपूर येथे बौद्ध धर्म दीक्षा घेण्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे ,
   ‘प्रबुद्ध भारत’ च्या संस्थापकांना एक विशेष संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाठविला असून बौद्ध धर्म स्वीकारावायाचा वर दिलेला दिवस, तिथी आणि समय कळविला आहे .
    विजयादशमीच मुहूर्त धर्मदिक्षेसाठी साधण्यात अत्यंत औचित्य आहे . विजयादशमी हि बौद्ध सम्राट महान अशोकाच्या विजयाचा दिन म्हणूनच पाळली जाते .अलीकडील तीनशे वर्षात पावसाळ्याच्या समाप्ती नंतर मराठे सिमोल्लोघन या विजयादशमी ला करीत असत . अस्पृश्य आणि दलित समाजाच्या डोक्यावर गेली हजार वर्षे जे काळेकुट्ट ढग जमले होते ते या अडीच हजाराव्या बौद्ध वर्षाच्या विजयादशमीला धर्मचक्र नवप्रवर्तन करून डॉ. बाबासाहेब नष्ट करणार आहेत . हिंदू धर्माच्या सिमामध्ये बंदिस्त अस्पृश्य समाज या दिवशी त्यांना शतकानुशतके गुलाम ठेवणारी धार्मिक तटबंदी उल्लंघून नव स्वातंत्र्याचे उदक पिण्यास तयार होणार आहेत . हेच ते खरे सीमोल्लंघन ते केल्यावर परत यावयाच नाही , या भीम निश्चयाने प्रत्येक अस्पृश्य दलितांचे पाउल पुढे पडणार आहे .
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्धधर्म दीक्षा समारंभ ब्रम्हदेशचे महास्थवीर पूज्य भिक्षु चंद्रमणी संपन्न करणार आहेत .त्याचवेळी दहालाख लोक बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी नागपूरला एकत्र येतील .
    नागपूर शहरात पूर्व दिशेकडून रायपूर , दृग , गोंदिया ,भंडारा या जिल्ह्यातून धर्म स्वीकारेच्छुक बौद्ध जन प्रवेश करतील , पश्चिम देशेकडून वर्धा , अमरावती ,अकोला , बुलढाणा या जिल्ह्यातून येणारे धर्म प्रवासी प्रवेश करतील तर दक्षिणेकडून मराठवाडा , चांदा ,बल्लारशाह ह्या विभागातील बौद्ध यात्रे करू येतील आणि उत्तर दिशेकडून उत्तर प्रदेश , मध्य भारत , भोपाल ,हुशांगाबाद , बैतुल , शविणी आदी विभागातील जनता पथकापथकाने समारंभाच्या जागेकडे बुद्धं ,शरणं ,गच्छामि च्या घोषणा करत येतील .
    ह्या प्रसंगी वर्धा आणि इतर मार्गातील सवर्ण हिंदूंचा एक प्रचंड गट बौद्ध दिक्षेसाठी येणार आहे .दीक्षा प्रसंगी पांढरे शुभ्र कपडे परिधान केले पाहिजे . व दीक्षा घेणाराचे वय १८ वर्षापेक्षा अधिक असले पाहिजे . हे नियम कसोशीने पाळले जातील .
    त्याच दिवशी संध्याकाळी नागपूर येथेच डॉ. बाबासाहेबांचे बौद्ध धर्म स्वीकारावरील ऐतिहासिक भाषण होणार आहे . जगाच्या धार्मिक इतिहासातील या क्रांतिकारक घटनेचे प्रत्यक्ष अवलोकन करण्याची संधी व त्यात भाग घेण्याचे महद् भाग्य आपल्याला लाभलेले आहे असे सांगतात कि , भ.बुद्धानंतर प्रथमत:च एकावेळी , एकदिवशी , एकेठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने बौद्ध धर्म स्वीकार केल्याचे कोठेही नमूद नाही .
                     नागपूरचे वैशिष्ट्य
    १९३० साली ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस लीगची स्थापना ,तदनंतर १९४२ साली अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची मुहूर्तमेढ डॉ. बाबासाहेबांनी नागपूरला केली . तसेच बौद्ध धर्म स्वीकारण्याचा समारंभ नागपूरलाच होणार .
                     प्रतिज्ञेची पूर्ती
    १९३५ साली डॉ . बाबासाहेबांनी ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असेन पण हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी प्रतिज्ञा केली आहे , तिची पूर्तता २१ वर्षानंतर होत आहे .- आर. डी . भांडारे ( प्रबुद्ध भारत ,साप्ताहिक , मुंबई , शनिवार ता. २९ सप्टेंबर १९५६ – बौद्ध वर्ष २५०१)
      हा पूर्ण लेख येथे दिला आहे ह्या वरून अगदी सिद्ध होऊन जाते कि डॉ.बाबासाहेब यांनी संपादकीय मंडळीला महत्व पूर्ण संदेश दिल्यावरून हा लेख त्यास उद्देशून लिहिला आहे . ह्यात दसरा म्हणजेच विजयादशमी ह्या दिनालाच महत्व दिलेले आढळते . प्रतिज्ञेची बातमी तिसऱ्या अगदी दोन ओळीत संपवण्यात आली आहे. तसेच ह्यात बाबासाहेब यांचा संदेश सुद्धा दिलेला आहे तो पुढे नमूद करतो .
              डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश
                     २६ ,अलीपूर रोड ,
     दिल्ली ता.२३ सप्टेंबर १९५६
     बौद्ध धर्म स्वीकारण्याचा दिवस व ठिकाण मी आता निश्चित केले आहे .येत्या दसऱ्यास तारीख १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथे मी धर्मांतर करणार आहे .
     या दिवशी सकाळी ९ ते ११ वाजता माझा धर्म दीक्षा विधी समारंभ होईल, व संध्याकाळी माझे सर्व लोकांसाठी जाहीर व्याख्यान होईल.
              बी.आर. आंबेडकर २३-९-१९५६
आता हा संदेश नीट अभ्यासला पाहिजे . ह्या ठिकाणी दिवस हा आधी 'दसरा' हा शब्द प्रयोग केला आहे म्हणजे डॉ.आंबेडकर यांना दसरा हा दिवस अपेक्षित आहे . साधी समज आहे कि दिवस मुक्रूर केला म्हणजे तारीख द्यावी लागेल त्या अर्थी बाबासाहेब यांनी पुढे तारीख दिली आहे. त्या तारखेला खास असे महत्व कोठेही त्यांनी नमूद केलेले नाही पण ‘दसरा’ हा शब्द त्यांनी स्पष्ट नोंदविलेला आहे . व त्यावर जोर दिलेला सुद्धा दिसतो . त्यामुळे त्यांचा विचार येथे अगदी स्पष्ट होतो . 
        प्रस्तुत विषय आणि त्यास हवे ते योग्य पुरावे मी दिलेले आहे तरी धम्म चक्र प्रवर्तन दिन हा दसराच मानावा असा डॉ.आंबेडकर यांचा मानस हि स्पष्ट होतो तरी काही महाभाग आजही १४ ऑक्टोंबर ह्या दिवसाचा प्रचार करतात . ज्यांना माहिती नसेल ते ठीक आहे पण माहिती असूनही फक्त आपले पक्ष , संघटना यांच्या नेत्यांच ऐकून प्रचार करणारे खूप महाभाग आहेत . ते आंबेडकर द्रोह करत आहेत ह्यात शंका नाही .तसेच अशा बुरखा पांघरलेल्या लोकांना आंबेडकर वादी समाजाने कणखर विरोध करणे हे आपले कर्तव्य आहे . अन्यथा माहित असूनही विरोध न करणे म्हणजे आंबेडकरद्रोह ठरू नये का ? तरी समाजात गैरसमज पसरविणे बंद करून दसरा ह्याच दिवशी ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ मानावा व साजरा करवा .न जे लोक समाजाला चुकीची दिशा दाखवत असतील असल्या मुर्ख लोकांना महत्व देऊ नये ते लोक मुद्दाम दुफळी माजवू पाहत आहे काही राजकारणाच्या नावावर तर काही समाजसुधारणेच्या नावावर .
धन्यवाद .
अभिजित गणेश भिवा .